उस्मानाबाद,दि.18:- वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त अन्य खर्च न करता आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य सेवा करण्याचा उपक्रम कौतुकास्पदच नव्हे तर अनुकरणीय सुध्दा आहे, असे उपक्रम सर्वांनीच राबवण्याची गरज आहे, असे मत पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय, आणि वस्त्रद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री श्री.अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केले.
उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथे स्व.ज्ञानोबा सोपान लाकाळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ छत्रपती बहुद्देशिय सामाजिक संस्था,पळसप व लाईफलाईन हॉस्पीटल उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील, उस्मानाबाद नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सुरज साळुंके, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय देवळकर, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, युवासेनेचे कार्यकर्ते अजित लाकाळ, शिवसेना तालुकाध्यक्ष (उमरगा) बाबूराव शहापूरे, युवासेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख नितिन लांडगे, दिलीप जावळे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना पालकमंत्री श्री. खोतकर म्हणाले की, आज स्मृतिदिन व अन्य कार्यक्रमासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येतात मात्र प्रत्यक्षात याचा उपयोग होताना दिसत नाही डॉक्टर तानाजी लाकाळ यांनी वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त संस्थेच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. यामुळे अनेक गरजूंना आरोग्य विषयक लाभ झाला आहे. असे उपक्रम राबवून प्रत्येकांनी समाजाला आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. शासनाच्या वतीने अनेक आरोग्य योजना राबवण्यात येत आहेत. यामुळे आरोग्य संवर्धन होण्यासाठी मदत होत आहे.
यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील बोलताना म्हणाल्या की, वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ आरोग्य शिबिराचे आयोजन करुन माणसामध्ये देव शोधण्याचा प्रयत्न आपण केला आहे.
या शिबिरात डॉ.नवीन तोतला, डॉ. तानाजी लाकाळ, डॉ. रणजीत कदम, डॉ.नितीन भोसले, डॉ. प्रेमसागर जाधव, डॉ. कुलदिप सस्ते, डॉ. गणेश पोलावार, डॉ. रविंद्र पापडे, डॉ. दिग्गज दापके, डॉ. अविनाश बदणे, डॉ. वसुधा दापके देशमुख, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. रेखा टिके, डॉ. स्वाती लाकाळ, डॉ. बालाजी लोमटे आदी तज्ञ डॉक्टरमार्फत 1638 रुग्णांची तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात आले. यावेळी मधुमेह रुग्णाची तपासणी सल्ला व उपचार, लहान मुलांची तपासणी, स्त्री रुग्णाची तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांची मोफत ईसीजी, मोफत (कावीळ) हिपाटासटीस बी तपासणीही करण्यात आली.
त्याचबरोबर यावेळी रक्तदान शिबिरात 20 रक्तदात्यानी रक्तदान केले. त्रस्त शेतकरी कुटुंबातील दोन पाल्यांचे इयत्ता 10 वी पर्यंतचे शैक्षणिक दत्तकत्वही संस्थेच्या वतीने स्विकारण्यात आले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या वर्षीच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रत्येकी पाच हजाराचा धनादेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ तानाजी लाकाळ, सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी केले तर आभार लक्ष्मीकांत लाकाळ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास फुटाणे, महादेव लाकाळ, धनंजय लाकाळ, संतोष लाकाळ, प्रमोद लाकाळ, रमेश लाकाळ, संतोष निकम, प्रदिप लाकाळ यांनी पुढाकार घेतला.