दि. 5 फेब्रुवारी
2018
ग्रामविकासात
लोकप्रतिनिधीची भूमिका आई-वडिलाप्रमाणे असावी
-माजी जि.प.उपाध्यक्ष भारत पाटील
उस्मानाबाद, दि.5:- आजच्या युगात ग्रामीण भागातील लोकांचा ओढा
शहरीकरणाकडे वाढला आहे त्यामुळे गाव सुजलाम-सफलाम करणे गरजेचे आहे. त्यासाठी
ग्रामविकासात लोकप्रतिनिधीची भूमिका आई-वडिलाप्रमाणे असावी, असे मत कोल्हापूर
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. भारत पाटील यांनी आज येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण
विकास यंत्रणा व लेडीज क्लब उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने “आद्या हिरकणी
महोत्सव व जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन 2018”
कार्यक्रमाचे आयोजन लेडीज क्लब, उस्मानाबाद येथे करण्यात आले आहे. या
महोत्सवात सोमवार दि. 5 फेब्रुवारी 2018 रोजी दुपारी 2 वाजता “ग्रामविकासात
लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांची भूमिका” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. भारत
पाटील बोलत होते. यावेळी तुळजापूर पंचायत समितीचे सभापती शिवाजी गायकवाड, उपमुख्य
कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मधुकर देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी
श्री. रावसाहेब चव्हाण, सहाय्यक प्रकल्प संचालक श्री. तायडे, जिल्हा अभियान
व्यवस्थापक श्रीमती. गंगा सुरगीहळळी, गट विकास अधिकारी (कळंब) श्री. काळे, जिल्हा
कार्यक्रम समन्वयक रमाकांत गायकवाड आदीची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना श्री. पाटील म्हणाले की, आई –वडील
आपल्याला ऊर्जा देण्याचे काम करतात त्या प्रमाणे गावात काम करताना लोकप्रतिनिधीची
भूमिका सकारात्मक, निष्ठेची, ऊर्जा देणारी असावी. हे गाव माझे कुटुंब आहे त्यामुळे
या कुटुंबाला आतड्याची माया लावली पाहीजे. ग्रामस्तरावर काम करताना जगातल्या सर्व
चांगल्या गोष्टी पाहून त्याचा अभ्यास करुन लोकप्रतिनिधीनी त्याचे अनुकरण करावे.
हागणदारीमुक्त गाव, तालुका, जिल्हा, राज्य व देश करायचे हा
ध्यास घेऊन ते पुर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. गावपातळीवर काम
करताना येणाऱ्या अडचणी प्रशासनाला सोबत घेऊन सोडविल्या पाहीजेत. प्रत्येकाने मोठे
स्वप्न पाहून ते पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे. अस्वच्छता, कुपोषितपणामुळे
आरोग्याची वाताहत होते, त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावणे, पाणी अडवणे आदी कामे
करुन शौच्छालयाचा वापर केला पाहीजे. व्यसनमुक्त गाव करण्यासाठी महिलांनी संकल्प
करावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी उपस्थित महिलांना यावेळी केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रमाकांम गायकवाड
यांनी केले तर आभार सहाय्यक प्रकल्प संचालक श्री. तायडे यांनी मानले यावेळी
स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिला, लोकप्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.
*******
No comments:
Post a Comment